अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’

अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’

   
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष्याच्या वाटेवर अनुभवलेले अनेक खडतर प्रवास, वेळोवेळी मिळालेले धक्के, पदरी पडलेले नैराश्य यातून खचून न जाता स्वयंसिद्धा अभियानात आजवर लाखो मुलींना प्रशिक्षित करून स्वतःला सिद्ध करण्यायोग्य बनविणाऱ्या मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी कविता सुभाष नावंदे यांची ही यशकथा..!
    कविता यांचे मूळ गाव आंबेजोगाई. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. घरात चार बहिणी, १ भाऊ असा परिवार. वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदलीमुळे परळी, पाटोदा, बीड येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण  केले. वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण करताच लग्न झाले. बीपीएड, एमपीएडचे शिक्षण औरंगाबाद येथे घेतले.
‘ते’ सात दिवस पहिला संघर्ष
    ८० च्या दशकात मुलींना फारसे शिक्षण घेऊ दिले जात नव्हते. कविता यांचे वडिल माणिकराव यांनी देखील त्यांना दहावीनंतर पुढे शिक्षण बंद असा आदेशच घरात दिला. आईने मस्का लावला, वडिलांच्या विनवण्या केल्या, मैत्रिणींच्या पालकांनी समजाविले परंतु ते काही ऐकत नव्हते, मग सुरु झाला पहिला एल्गार.. पुढील शिक्षणाला परवानगी मिळेपर्यंत काहीही न खाण्याचा.. इवल्याशा वयात कविता यांनी ८ दिवस उपवास केल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली. आई विजयलक्ष्मी यांनी उत्साह वाढविला.
शालेय जीवनापासून चपळ, पण..
    कविता या शालेय जीवनापासूनच हुनहुनरी होत्या. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी चांगले यश संपादन केले. कब्बडी, भरतनाट्यम, बॅडमिंटनमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य संपादन केलं होत. कराटे प्रशिक्षण घेत, होमगार्डांना देखील प्रशिक्षण दिले. स्पर्धांमध्ये यश संपादन करीत अनेक बक्षीस, प्रमाणपत्र मिळविली. आपण कराटे मास्टर असल्याच्या अविर्भावात असतांनाच कराटेला मान्यताच  नसल्याचे कविता यांना कळले. लग्नानंतर पुन्हा ज्युडो प्रशिक्षण घेतले. त्यात प्राविण्य मिळवले. अभ्यासासोबतच फावल्या वेळेत कविता यांनी अनेक ‘कविता’ आपल्या वहीत उतरविल्या. अनेकांना प्रेरणादायी ठरतील अशाच कविता वाचून अनेकांनी दाद दिली.
मनावर दगड ठेवत पटकाविला मान
     कविता यांचे बाळ ८ महिन्यांचे असतांना त्या एनआयएस डिप्लोमासाठी पटियाला येथे रवाना झाल्या. २ वर्षाच्या या अभ्यासक्रमात सहा महिन्यांनी एकदा बाळाची भेट होत होती. आईचे काळीज कासावीस होत असतांना वैद्यकीय शिक्षणाचा अर्धा अभ्यासक्रम असलेला एनआयएसचा अभ्यास करावा लागत होता. सर्व खडतर काळ असतांना देखील कविता यांनी एनआयएस डिप्लोमा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होण्याचा मान पटकाविला. पती सुभाष नावंदे यांनी चांगले सहकार्य केले.
लाखो मुलींना दिले स्वयंसिद्धाचे प्रशिक्षण
   
१९९८ मध्ये शासकीय प्रशिक्षक म्हणून औरंगाबाद येथे पहिली नेमणूक झाली. औरंगाबाद, सांगली येथे सेवा बजाविल्यानंतर पुणे येथे रुजू झाल्या. २००१ ला शासनाच्या धोरणानुसार स्वयंसिद्धा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. कविता यांनी योजनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी ग्रामीण तसेच शहरी मुलींना ज्युडो, कराटेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आजवर कविता नावंदे यांनी जवळपास २ हजार मास्टर्स घडविले असून लाखो मुलींना प्रशिक्षण दिले आहे. शासनाकडून आजवर कोणताही निधी न घेता केवळ महिला सक्षम व्हाव्या या उद्देशाने त्यांनी राज्यात महिला, मुलींचं एक संघटन उभारलं. आजदेखील कविता यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या विद्यार्थिनी विना मोबदला शहरी, ग्रामीण व आदिवासी बहुल भागात प्रशिक्षण देत आहेत.
एमपीएससीनंतर पुन्हा संघर्ष
     कविता यांनी १९ जून १९९८ रोजी शासन सेवेत ज्युदो क्रीडा मार्गदर्शक म्हणून पदार्पण केलं. शासकीय प्रशासकीय अधिकारी म्हणून कविता यांनी २००९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज केला. अर्ज छाननीनंतर आयोगाने वयोमर्यादा ओलांडलेली असल्याने परीक्षा देता येणार नसल्याचे पत्र कविता यांना पाठविले. अर्ज करतांना कविता यांचे वय ३३ होते. कविता या १९९८ मध्येच शासकीय सेवेत रुजू झालेल्या असतांना देखील तुम्ही शासकीय नोकर नसल्याची  चुकीची माहिती सांगून वयाची ५ वर्ष सवलत न देता त्यांना डावलण्यात आले. स्वताच्या हक्कासाठी कविता यांना मँट कोर्टापासून, हायकोर्ट लढा द्यावा लागला. पहाटे ४ वाजेपासून उठून पुणेहून मुंबईला दिवसभराची फिरफिर करीत रात्री १ वाजता त्या घरी पोहचत होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार ११ जुलै २०११ रोजी कविता यांची परीक्षा घेण्यात आली. १९ जून २०१२ रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला परंतु कविता यांचा निकाल राखून ठेवण्यात आला. त्याविरुद्ध कविता यांनी पुन्हा उच्च न्यायालयाचे दार ठोटावले. उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आदेश दिला. तरीही आयोगाने कविता यांचा निकाल घोषित न करता त्यांना रुजू करून घेतले नाही. दरम्यान, लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यास आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देवू नये अशी विनंती याचिका कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. तत्कालीन विरोधीपक्षनेते ना.विनोद तावडे यांनी सहकार्य केल्याने कविता या पुणे येथे सहाय्यक संचालक म्हणून रुजू झाल्या. सर्व योग्य असतांना देखील कविता यांना २ वेळा मॅट, २ वेळा उच्च न्यायालय आणि १ वेळा सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली. यासर्व प्रक्रियानंतर २००९ पासून सुरु झालेला प्रशासकीय अधिकारी होण्याचा संघर्ष ऑगस्ट २०१४ मध्ये संपला.
बेस्ट कोच अवार्डसाठी प्रतिक्षा अन दगदग
    भारतातील पहिल्या पदवीप्राप्त महिला प्रशिक्षक असल्यानंतर कविता यांनी लाखो मुलींना स्वताच्या बचावाचे धडे दिले, सामाजिक कार्यात सहभाग घेतला.शिव छत्रपती जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार - बेस्ट कोच अवार्ड कविता यांना २००४ मध्ये मिळायला हवा होता, परंतु त्यासाठी देखील संघर्ष करावा लागला. मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी पोशमपल्लू सर, क्रीडापटू धनराज पिल्ले, अंजली भागवत यांनी पुढाकार घेतल्याने २०१४ मध्ये कविता यांना राज्यातील शासकीय सेवेतील १२८ प्रशिक्षकांमधून तर ज्युडो या खेळातील असताना मिळालेला हा पहिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
स्वतःची स्वप्ने, स्वतःचा आत्मविश्वास घेऊन प्रवास

   
कविता नावंदे यांनी लहानपणापासून पाहिलेली स्वप्ने आणि कोणतेही कार्य स्वत: पार पाडण्याचा असलेला आत्मविश्वास त्यांना आज मंत्रालयापर्यंत घेऊन आला आहे. शालेयशिक्षण व क्रीडा मंत्री ना.विनोद तावडे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्या आज काम पाहत आहे. खेळाडू व त्यांच्या समस्या, महिला स्वसंरक्षण काळाची गरज, ग्रामीण भागातील मुलींसाठी काहीतरी करण्याची तळमळ, युवकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे, सर्वांसाठी सुदृढता, युवा नेतृत्व विकास, क्रीडा विषयक अनेक समस्या त्यांना आज देखील स्वस्थ बसू देत नाही. सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यभरातील युवा-युवतींना एकत्रित आणणे त्यांना शासन योजनांची माहिती देणे, स्वंयसिध्दा युवती व युवा प्रशिक्षण देणाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना विविध माध्यमातून योग्य दिशा दाखवून त्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहतात.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग