पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS)
चेतन वाणी - एखाद्या पत्रकाराने पोलिसाचे कौतुक करणे म्हणजे नवलच.. गावभरात पोलिसांविषयी ओरड होत असतांना आपण एखाद्या अधिकाऱ्याचे कौतूक करणे म्हणजे दुखावलेल्या आत्म्यांच्या आगीत तेल ओतण्यासारखेच काम आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत जळगाव जिल्हा तसा नशीबवानच ठरला आहे. जिल्ह्याला एक तपापासून लाभलेले जवळपास सर्वच अधिकारी एखादे व्यक्तिमत्व सोडले तर सर्वच चांगलेच होते. विशेषतः पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेच्या मनात निर्माण केलेली जागा एका मित्रापेक्षा कमी नाहीच.
जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचा एक तपाचा नामफलक पाहिला तर महाराष्ट्रीयन आणि दक्षिणेतील अधिकारी असा संमिश्र राहिला आहे. गेल्या बारा वर्षात जिल्ह्याने ७ पोलीस अधीक्षक पाहिले. कुणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी लकी ठरले तर कुणी पोलिसांनाच खाक्या दाखविला. कोरोना काळात लाभलेले पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे हे बहुतांश काळ जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. अनेक कार्यक्रमात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. पहिल्यापासूनच सर्वांच्या संपर्कात असल्याने डॉ.प्रवीण मुंढे हे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जनतेत चांगलेच लोकप्रिय ठरले. आपला २ वर्षाचा कार्यकाळ त्यांनी कोणतेही मोठे विघ्न न येऊ देता पार पाडला.
डॉ.प्रवीण मुंढे यांच्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून एम.राजकुमार यांनी पदभार स्विकारला. राजकुमार यांच्याबद्दल ऐकून असलेली प्रतिमा काहीशी वेगळी आणि कणखार अधिकारी अशी असल्याने सुरुवातीला त्यांच्याशी ओळख झाली नाही. साधारणतः महिनाभराने पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी परिचय झाला. पहिल्या भेटीतच एम.राजकुमार साहेबांनी दिलेला वेळ आणि आपल्या कार्यापद्धतीची स्पष्टता दिली. रस्त्यावर उतरून हातात काठी घेत सिंघम बनायची मला हौस नाही मात्र कुणाला कसे ठिकाणावर आणायचे हे मला चांगलेच माहिती आहे असे ते बोलले. आमच्या खात्यात प्रत्येक काम करायला वेगवेगळे खाते असून त्यामाध्यमातून कायदा व सुव्यवस्था कायम राखता येईल असा विश्वास साहेबांनी दिला.
पहिल्या भेटीनंतर साहेबांशी वारंवार भेटी होऊ लागल्या. केवळ खात्याशी निगडीत चर्चा न होता कौटुंबिक आणि अवांतर गप्पा होऊ लागल्याने एक मैत्रीचे नाते तयार झाले. एखाद्याबद्दल मत जाणून घ्यायचे असेल किंवा सामाजिक, राजकीय आढावा घ्यायचा असेल तर साहेब हक्काने विचारू लागले. काही दिवसातच साहेबांनी आपल्या कामातून आपली प्रतिमा आणि खरे रूप दाखवून दिले. वर्षभरात ‘अब तक छप्पन’चे टार्गेट घेऊन कामाला लागलेल्या एम.राजकुमार साहेबांच्या कार्यकाळात आजवरचे सर्वाधिक म्हणजे ५६ एमपीडीए साहेबांच्या कार्यकाळात झाले. ‘अब तक छप्पन’ या आकड्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन राज्यात एक नंबरवर आहे.
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे प्रचंड शिस्तप्रिय आणि फारशे बोलणारे नाही अशी त्यांची ऐकीव प्रतिमा असल्याने अनेकांच्या मनात ती कायम राहिली मात्र साहेबांना ज्यांनी जवळून ओळखले त्यांनाच ते कळले. विशेषतः कर्मचाऱ्यांनी त्यांना चांगलेच ओळखले. नाशिक परिक्षेत्र विभागीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पोलीस खेळाडूंनी साहेबांना जवळून पाहिले. साहेब फार रागीट आहेत, वेळेतच कामे बघतात, अडचणी समजून घेत नाही, कुणाशी फारशे बोलत नाही अशा बऱ्याच गोष्टी साहेबांबद्दल ऐकून असले तरी प्रत्यक्षात मात्र ते एक उत्तम अधिकारी आणि एक चांगला मुलगा, पती, वडील आणि जावई आहेत. आपल्या दररोजच्या वेळेतून वेळ काढत ते कुटुंबाला वेळ देतच होते. कुटुंबासोबतच्या वेळेत ते शक्यतो तडजोड करीत नाही. काहींना आपल्याप्रमाणे ऐकणारा आणि दिवसरात्र कार्यालयात बसून राहणारा अधिकारी आवडतो मात्र एम.राजकुमार साहेब ज्या-त्या बाबीसाठी काढलेला वेळ त्याच वेळेला देत होते.
पत्रकारितेच्या निमित्ताने नेहमी भेटतांना साहेबांनी अनेक गोष्टी आमच्याशी शेअर केल्या. बऱ्याच तर ‘ऑफ द रेकॉर्ड’ संज्ञेत मोडणाऱ्या तर कितीतरी गोष्टी कौटुंबिक होत्या. दूरदृष्टी, सरळ वागणे, नियमांशी तडजोड न करणारे, युवक, समाज, देशाचे हित जोपासणारे, कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणजे एम.राजकुमार साहेब. आपल्याला भेटायला येणाऱ्या व्यक्तींना साहेब फारसा वेळ देत नाही अशी काहींची तक्रार असेल मात्र आजवर जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांना भेटायला गेलो तेव्हा तेव्हा साहेबांनी भरभरून गप्पा केल्या. बऱ्याचदा तर साहेबांच्या कार्यालयीन स्टाफला देखील आम्ही आल्यावर संकट पडायचे हे आले आता तर केव्हा बाहेर पडणार काय माहिती? इतकचं काय तर कालच अमळनेर दौरा आटोपून साहेब कार्यालयात आले आम्ही सहज भेटीसाठी गेलो तरी आमच्या गप्पा तासभर रंगल्या.
अवघ्या १४ महिन्यांच्या काळात एम.राजकुमार साहेबांनी आपल्या शिस्तप्रिय स्वभावाची जाणीव करून देत अनेकदा अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील सांभाळून घेतले. साहेबांच्या कार्यकाळात कुणावर अन्याय झाला असेल असे मला तरी नाही वाटत. जिल्ह्यातील एखाद राजकारणी सोडले तर इतर कुणीही साहेबांबद्दल काही तक्रार केली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांशी त्यांनी चांगले जुळवून घेतले. पदभार घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीमुळे वाढलेले वाद, निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले प्रकरण, अधिवेशनात अवैध धंद्यावरून झालेले आरोप, चाळीसगाव खंडणी प्रकरण, बीएचआर प्रकरण, मोठमोठ्या घरफोडी, दरोडे, लुट, खून प्रकरण साहेबांनी उत्कृष्टपणे हाताळले. जिल्ह्यात सर्व सणोत्सव शांततेत पार पडले आणि गुन्हेगारी हटावच्या मायक्रो नियोजनामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली.
जिल्ह्यात नव्याने येणारे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देखील मावळते पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे आपल्या यशस्वी कारकीर्दीच्या टिप्स देतील आणि सोलापूर शहर आपल्या दमदार कामगिरीने गाजवतील यात शंका नाही.
भविष्यातील सर्व यशस्वी कारकिर्दीसाठी एम.राजकुमार साहेबांना शुभेच्छा..!